top of page

महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना देव विशेष वरदान देऊनच पाठवतो...

  • dhadakkamgarunion0
  • 2 hours ago
  • 2 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना देव विशेष वरदान देऊनच पाठवतो, यात शंका नाही. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये हजार-पाचशे कोटींचा भ्रष्टाचार केला की जेलची हवा खावी लागते, पण महाराष्ट्रात मंदिरातील कोट्यवधींची लूट, जमिनींचे अब्जावधींचे घोटाळे आणि जलसिंचनाचा सत्तर हजार कोटींचा महाघोटाळा सारे करा आणि "क्लीन चिट" घेऊन गुपचूप बाहेर पडा. गुन्हेगारांना साथ देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिक्षा नाही, उलट बढती! शासन-प्रशासन-न्यायव्यवस्था या तिन्ही खिडक्या एकाच काउंटरवर उघडतात इथे. खऱ्या अर्थाने "सिंगल विंडो क्लिअरन्स!" त्यामुळे आता व्यावसायिक मार्गदर्शनासाठी फक्त एकच सल्ला तुम्हाला उद्योग करायचा असेल तर महाराष्ट्रात या, आणि घोटाळा करायचा असेल तर… तरीही महाराष्ट्रातच या.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

कॉकरोच जनता पार्टीच्या स्टार प्रचारकाचं वक्तव्य की “मला भारत आवडत नाही, पैसा आला की देश सोडून जाईन” हे केवळ वैयक्तिक मत नाही, तर विशिष्ट अजेंडा आहे. देशात अराजक माजवायचं, तरुणांची दिशाभूल करायची, परदेशी फंडिंगवर आंदोलनं उभी करायची आणि शेवटी परदेशात सेटल व्हायचं—हेच त्यांचं क्रांती मॉडेल आहे. ज्यांना या मातीबद्दल प्रेम नाही, तिरंग्याचा अभिमान नाही, त्यांनी देशाचं भलं कसं करावं? स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, भूमीशी एकनिष्ठ राहता येत नसेल तर व्यवस्थेवर बोलू नये. आज राहुल गांधींपासून या प्रचारकांपर्यंत भाषा एकच—भारताला शिव्या द्या आणि मतं मागा. अशा लोकांना बदल नकोय, अराजक हवंय. उत्तर सोपं आहे: यांना देश बदलायचा नाही, देश विकायचा आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

“खुळ्यात निघतो” ही भावना महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक वास्तवाचं आरसपानी दर्शन घडवते. आयुष्यभर संघावर हिणवणारे, ब्राह्मणधर्माची टिंगल करणारे, पुरोगामीपणाची भाषा करणारे नेते, लग्नसमारंभात मात्र त्याच संघटनेचे प्रमुख पाहुणे, ब्राह्मणाच्या साक्षीने विधी, अदानी-अंबानींच्या आलिशान हॉलमध्ये सोहळे—हेच त्यांचं दुटप्पीपण. भाषणात दुष्काळ, बळीराजाची हाक, जातिवादाचा गजर; पण प्रत्यक्षात खर्ची पडणारी चैनी, जाती विसरणारी सोय. लोकांना दिशाभूल करून स्वतःसाठी सोयीस्कर मार्ग निवडणं हीच त्यांची खरी ओळख ठरते. म्हणूनच जनता रोज त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवते, पण मोक्याच्या क्षणी त्यांचं दुटप्पी वर्तन उघड होतं. आणि मग आम्ही, त्यांच्या मागे चालणारे, “खुळ्यात निघतो” हेच सत्य मान्य करावं लागतं.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

चंद्र आणि मंगळावर यान पाठवणाऱ्या भारताला आपल्याच दीडशे कोटी नागरिकांना "तुम्ही भारतीय आहात" हे सांगणारा एकही ठोस दस्तावेज देता येत नाही हा शुद्ध नालायकपणा आहे. हे प्रशासन, संविधान आणि सरकार तिघांचेही मोठे अपयश आहे. पासपोर्ट नाही, आधार नाही, मतदार ओळखपत्र नाही, पॅन नाही अरे मग सांगा तरी, कोणता "कागज" दाखवायचा? पंच्याहत्तर वर्षांत एकाही सरकारला हा मूलभूत प्रश्न सोडवण्याची गरज वाटली नाही, कारण हे अस्पष्टतेचे राजकारण सत्ताधाऱ्यांना सोयीचे आहे. जेव्हा हवे तेव्हा एखाद्याचे नागरिकत्व संशयाच्या भोवऱ्यात ओढता येते. ज्या देशात नागरिकाला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कागदांची माळ गळ्यात घालावी लागते, त्या देशाचे लोकशाही दावे पोकळ आहेत.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

लोहगड हत्याकांडानंतर समाजमाध्यमांवर जे चित्र उभे राहत आहे ते केवळ अस्वस्थ करणारे नाही, तर समाजाच्या नैतिक अध:पतनाचे दर्शन घडवणारे आहे. खुनी आरोपीची "मानसिक अवस्था" समजून घेण्याची घाई करणारे तज्ज्ञ आणि सुशिक्षित उरबडवे मात्र निर्दोष बळीचा निष्पापपणा सोयीस्करपणे विसरून जातात. आधुनिक मानसशास्त्राने गुन्हेगाराला 'बळी' ठरवण्याची जी फॅशन आणली, त्यातून गुन्हेगारीला अप्रत्यक्ष समर्थनच मिळते. गुन्हेगाराच्या मानवी अधिकारांचा विचार करणारे तज्ञ पीडिताचा नेमका हाच अधिकार गुन्हेगाराने निर्दयीपणे हिरावून घेतला हा मुद्दा कधीच लक्षात घेत नाहीत. धाकाशिवाय, शिक्षेच्या भीतीशिवाय समाज सुसंस्कृत राहत नाही. हे कटू सत्य स्वीकारण्याऐवजी "प्रत्येकाची बाजू असते" असे म्हणत गुन्हेगारांना उजळ माथ्याने वावरायची मुभा देणे म्हणजे समाजाच्याच मुळावर घाव घालणे आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page