top of page

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज...

  • dhadakkamgarunion0
  • 8 hours ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज अनेक क्षेत्रांत प्रशंसनीय असले तरी गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी सतत प्रश्नांकित ठरते. इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी कायद्याचा वापर करून धमकी देणाऱ्यांवर, समाजकंटकांवर त्वरित कारवाई केली आहे; मात्र महाराष्ट्रात अशा घटनांवर गृहमंत्र्यांची भूमिका कमकुवत दिसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही गृहखात्याची प्राथमिक जबाबदारी असून तीच वारंवार अपयशी ठरतेय. संघ पार्श्वभूमीमुळे शांतीब्रह्म वृत्ती असणे वेगळे, पण गृहमंत्री म्हणून कठोर कारवाई न करणे ही गंभीर त्रुटी आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वोच्च आहे. त्यामुळे फडणवीस यांनी गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे किंवा हे खाते संघाबाहेरील सक्षम नेत्याकडे द्यावे, अशी मागणी आता योग्य ठरते. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे इतर काम उत्तम आहे, पण गृहखाते मात्र सपशेल नापास आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अभिषेक बॅनर्जी व तृणमूल प्रवक्त्यांच्या धमकीच्या क्लिप्सनी बंगालच्या राजकारणातील अस्वस्थता उघड केली आहे. “तुम्ही तुमच्या बापाचे पुत्र असाल तर ४ मे रोजी बंगालमध्ये हजर राहा” अशा शब्दांत अभिषेकने सरळ आव्हान दिले, तर रोड शोमध्ये “यावेळी मी स्वतः हाताळेन” अशी धमकी दिली. ममता बॅनर्जींच्या भाषणातही आक्रस्ताळेपणा दिसतो. यावरून स्पष्ट होते की तृणमूलच्या पायाखालची जमीन सरकत आहे. सलग ३४ वर्षे कम्युनिस्ट व १५ वर्षे ममतांची सत्ता, बंगालने कधीच खरी स्वातंत्र्याची फळं चाखली नाहीत. आता जनतेसमोर सुवर्ण संधी आहे—पुरोगामी पोथीनिष्ठ मानसिकतेतून मुक्त होऊन सामान्य हिंदूंना सुरक्षित श्वास घेता यावा. केंद्रीय नेतृत्वावर विश्वास हा निर्णायक ठरणार आहे. बंगालसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, आणि जनता आशेने पाहतेय.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

गौतम खट्टर प्रकरणाने एक महत्त्वाचा धडा दिला आहे—भाषा आणि संस्कृतीचा आदर न करता केलेले वक्तव्य हे शौर्य नव्हे तर उथळपणा ठरते. गोव्याची परंपरा ही संयम, सुज्ञता आणि परिपक्वतेची आहे; ४५० वर्षांच्या क्रूर राजवटीतही गोवेकरांनी धर्म आणि संस्कृती जपली. अशा समाजासमोर आक्रस्ताळ्या शब्दांचा वापर करणे ही चूकच. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी योग्यच म्हटले की बाहेरील वक्त्यांना आमंत्रित करताना आयोजकांनी त्यांना स्थानिक संस्कारांची जाणीव करून द्यावी. व्यक्त होताना ‘भान’ ठेवणे ही खरी शूरता आहे. रिकाम्या भांड्याचा खळखळाट जसा मोठा असतो, तसा काही तथाकथित शूरवीरांचा गोंगाटही असतो. गोव्याच्या सरकारची कारवाई ही संस्कृतीच्या रक्षणासाठी योग्य पाऊल आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ओडिशातील केओंझर जिल्ह्यातील जीतू मुंडा प्रकरणाने प्रशासनातील असंवेदनशीलता उघड केली आहे. बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या खात्यातील १९,३०० रुपये काढण्यासाठी तो महिनोन्‌महिने बँकेचे फेरे मारत होता. अशिक्षित असल्याने त्याच्याकडे मृत्यू दाखला नव्हता. बँक कर्मचाऱ्यांनी नियम सांगितले पण मार्गदर्शन केले नाही. शेवटी त्रस्त होऊन त्याने बहिणीचा सांगाडा उकरून बँकेत आणला—“ही घ्या अकाउंट होल्डर” असे दाखवण्यासाठी. पोलिसांनी हस्तक्षेप करून मदतीचे आश्वासन दिले. दोष ग्रामपंचायत व ग्रामसेवकांचा आहे ज्यांनी मृत्यू दाखला दिला नाही, तसेच बँक मॅनेजरचा आहे ज्याने संवेदनशीलतेने केस हाताळली नाही. नियम पाळणे चुकीचे नाही, पण नागरिक अशिक्षित असतील तर त्यांना नीट समजावून सांगणे हीच खरी जबाबदारी आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२६ च्या निकालांनी भाजपाची पोलादी पकड पुन्हा सिद्ध केली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत—चारही स्तरांवर भाजपाचे वर्चस्व निर्विवाद ठरले. काँग्रेस व आप यांचा सहभाग नगण्य राहिला. याचा स्पष्ट संदेश असा की दिल्लीकडे स्वारी करण्याआधी गृह राज्यावर पूर्ण ताबा असणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदींनी सलग तीन टर्म स्वबळावर जिंकून, संघटना मजबूत करून, अमित शहा सारखा तगडा साथीदार घेऊन अख्खा देश पादाक्रांत केला. गुजरातचे हे यश टिकवून ठेवणे म्हणजे २०२९ च्या लोकसभा मोहिमेसाठी शुभसंकेत. पाळीव पत्रकारांच्या भरवशावर स्वप्न पाहण्याऐवजी संघटनशक्ती वाढवणे हेच खरे राजकारण आहे. गुजरात भाजपाचे हे उत्तुंग यश संघटनेच्या ताकदीचे जिवंत उदाहरण आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page