कालपासून सोशल साईटवर लडाख च्या जवळ...
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
कालपासून सोशल साईटवर लडाख च्या जवळ सैन्याचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याने चार तास रास्ता ब्लॉक होता त्यामुळे सैन्याला शिवीगाळ करणारी तरुणी ट्रेंडिंग आहे. Gen-Z असणे म्हणजे आधुनिक विचारांचे असणे; पण आधुनिकता आणि सिविक सेन्सचा अभाव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे, पोलिसांच्या गैरवर्तनावर टीका करणेही आवश्यक आहे; पण प्रत्येक बॅरिकेड, प्रत्येक सुरक्षा तपासणी आणि प्रत्येक निर्बंधाला ‘दडपशाही’ ठरवून सैन्य-पोलिसांना शिवीगाळ करणे म्हणजे जागरूकता नव्हे. विशेषतः दहशतवादविरोधी कारवाई सुरू असताना सुरक्षा दलांनी उभारलेला अडथळा तुमचे स्वातंत्र्य हिरावण्यासाठी नसतो; अनेकदा तो तुमच्या आणि संभाव्य धोक्याच्या मध्ये उभा असतो. प्रश्न विचारणारी तरुण पिढी लोकशाहीची ताकद आहे; पण प्रश्नासोबत परिस्थिती समजून घेण्याची जबाबदारीही आली पाहिजे. ‘आम्ही Gen-Z आहोत’ हे विवेकशून्य आक्रमकतेचे लायसन्स नाही. देशभक्ती म्हणजे सरकारची आंधळी भक्ती नव्हे; पण स्वातंत्र्य आणि सुरक्षितता जपणाऱ्या जवानांचा विनाकारण अपमान करणेही पुरोगामित्व नव्हे हे आता ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
कालपर्यंत तामिळनाडूत भाजपचा चेहरा म्हणून कौतुक झालेले के. अण्णामलाई आज पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारतात आणि काही सोशल-मीडिया समर्थकांना अचानक त्यांचे ऑक्सफर्डमधील शिक्षण आठवते! आजतकच्या मुलाखतीत अण्णामलाई म्हणाले—दिल्लीतील CJP आंदोलनाच्या वेळी भाजपने आंदोलकांच्या मागण्या ऐकून घ्यायला हव्या होत्या. या मताशी असहमत व्हा, प्रतिवाद करा; पण त्यासाठी त्यांना ‘फॉरेन एजंट’ ठरवणे हा कसला राष्ट्रवाद? अण्णामलाईंचा प्रश्न अधिक बोचरा आहे—ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतल्यामुळे देशनिष्ठा संशयास्पद ठरत असेल, तर पीयूष गोयल आणि निर्मला सीतारामन यांच्यासाठी तोच निकष का नाही? आपल्या नेत्यासाठी एक माप आणि टीकाकारासाठी दुसरे, ही देशभक्ती नव्हे. भाजप समर्थकांनी टीकेला उत्तर मुद्द्यांनी द्यावे; प्रमाणपत्रांनी नाही. सोयीप्रमाणे बदलणारा राष्ट्रवाद अखेरीस राष्ट्रवाद राहत नाही—तो निव्वळ राजकीय ढोंगीपणा ठरतो.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
PM CARESचा भयंकर ‘घोटाळा’ अखेर उघड झाला म्हणे! आरोप काय? पैसा मोदींच्या कुटुंबाकडे गेला? नाही. गायब झाला? नाही. बँकेत पडून व्याज मिळवत राहिला—हाच बहुधा नवा गुन्हा! २०२० मध्ये कोविडने देशाला घेरले तेव्हा व्हेंटिलेटर्स, स्थलांतरितांची मदत, लस संशोधन आणि पुढे ऑक्सिजन प्रकल्पांसाठी PM CARESमधून निधी देण्यात आला. आता २०२४-२५ मध्ये मोठा निधी मुदतठेवींमध्ये शिल्लक आहे आणि खर्च तुलनेने कमी झाला म्हणून सोशल मीडियावर ‘स्कॅम’चा ढोल! अरे बाबा, आपत्कालीन निधी म्हणजे दिवाळी सेल नाही की वर्षाअखेरीस सगळा माल संपवलाच पाहिजे! पारदर्शकतेवर प्रश्न विचारा, RTIबाबत आक्षेप घ्या, निधी कुठे आणि कधी वापरावा यावर सरकारला जाब विचारा—अवश्य! पण पैसा बँकेत सुरक्षित आहे आणि व्याज मिळवतोय, यालाच ‘पैसा गायब’ म्हणणे म्हणजे ऑडिट नव्हे; कॅल्क्युलेटर हातात घेऊन केलेली राजकीय कॉमेडी आहे!
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
‘स्कूल ठीक करो’ हे अभियान मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. त्यामागे कोणता पक्ष आहे, यापेक्षा त्याचा उद्देश मला अधिक महत्त्वाचा वाटतो. स्वातंत्र्याच्या आठ दशकांनंतरही शाळांमध्ये सुरक्षित इमारत, स्वच्छतागृहे, पाणी, ग्रंथालय, प्रयोगशाळा, मैदान आणि पुरेसे शिक्षक यासाठी अभियान चालवावे लागणे दुर्दैवी आहे. माझ्या मते शासनाने प्रत्येक शाळेचे पालक आणि स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन प्रत्यक्ष ग्राउंड ऑडिट केले पाहिजे. विद्यार्थ्यांची वाचन, लेखन आणि गणिताची पातळीही तपासली पाहिजे. शिक्षकांवरील अवांतर कामांचा भार कमी करून त्यांना शिकवण्यासाठी सक्षम केले पाहिजे. कॉकरोच जनता पार्टीशी माझे वैचारिक मतभेद असले, तरी त्यांनी सुरू केलेल्या या लोकहिताच्या अभियानाचे मी स्वागत करतो. कारण माझा ठाम विश्वास आहे—सक्षम आणि विकसित भारताचा खरा मार्ग सक्षम शाळांमधूनच जातो!
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*,
‘सगळी गुंतवणूक गुजरातलाच जाते’ हा आरोप अतिशयोक्त असू शकतो; पण तो पूर्णपणे निराधारही म्हणता येणार नाही. २०२२ मध्ये पुण्याजवळील तळेगावसाठी चर्चेत असलेला तब्बल ₹१.५४ लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेला आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांकडून महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पासाठी मदतीचे आश्वासन मिळाल्याचे सांगितले होते. आज के. अण्णामलाईही ‘Gujarat-centric’ विकासावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे मोदी-शहा यांच्यावर या मुद्द्यावर टीका झाली तर ती देशविरोधी ठरवण्याचे कारण नाही. गुजरातचा विकास जरूर व्हावा; पण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बंगाल आणि ईशान्य भारतालाही समान संधी मिळाली पाहिजे. राष्ट्रीय नेतृत्वाने विकासाची गंगा संपूर्ण भारतात पोहोचवावी—कारण पंतप्रधान एका राज्याचे नसतात; ते संपूर्ण भारताचे असतात!
🔽
#GenZ #CivicSense #NationalSecurity #IndianArmy #Democracy #PMCARES #Education #SchoolReforms #Development #Gujarat #Maharashtra #TamilNadu #India #AbhijeetRane #MumbaiMitra









Comments