🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Aug 5
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सामान्य नागरिकांनी सातत्याने दक्ष रहाणे आणि माहिती अधिकार कायद्याचा योग्य वापर करणे का आवश्यक आहे हे सिद्ध करणारी ही घटना.पुण्यात स्मार्ट सिटी मिशनवर जवळपास ३३३३ कोटी रुपये खर्च करण्यात आला.वीर बाइक या कंपनीचे संस्थापक रवी कुमार यांनी या प्रोजेक्टच्या माहितीसंदर्भात एक आर टी आय टाकली. आणि यातल्या एका एका प्रोजेक्टला दररोज भेट देऊन काय काम झालं आहे याची माहिती घ्यायची असं त्याने ठरवलं.जेव्हा तो बाणेरमधील फक्त महिलांसाठी ५६ लाख खर्चून बांधण्यात आलेल्या जीमला भेट द्यायला गेला तेव्हा त्याला समजलं की ही जीम मल्टीफिट नावाच्या खाजगी कंपनीला कसल्याही परवानगीशिवाय ताब्यात देण्यात आले. ही खाजगी कंपनी लोकांकडून सरकारी पैशाने बांधलेल्या जीम मेंबरशिपचे पैसे उकळत होती. त्याने ही गोष्ट उघडकीला आणल्यावर ती सरकारी पैशाने बांधलेली जीम आता परत महापालिकेच्या स्वाधीन करून महिलांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. १० रुपये खर्चून टाकण्यात आलेल्या आरटीआय ने ही जादू केली नाहीतर काही दिवसांनी ती जीम एखाद्या सरकारी बाबूच्या किंवा राजकिय नेत्याच्या कुटुंबियांच्या किंवा घरगड्याच्या नावावर जमा झाली असती.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
दिल्लीत काही मोठी घडामोड होणार आहे काय ? अशी चर्चा सध्या रंगली आहे. कारण पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली. पाठोपाठ अमित शहा यांनी भेट घेतली. यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द केली गेली आहे. काही सूत्रांच्या मते पहलगाम हल्ला , त्यातील स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनातील कर्मचार्यांचा हेतुपूरस्सर हलगर्जीपणा याची केंद्र सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली असून त्यामुळे कदाचित लडाख आणि काश्मीर हे कायमचे केंद्रशासित प्रदेश बनवले जाऊन केवळ जम्मू इथेच विधानसभा अस्तीत्वात राहील अश्या पद्धतीचा कायदा केला जाण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यातील अब्दुल्ला सरकारची भूमिका हा कायमच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा मुद्दा राहिला आहे. त्याच प्रमाणे या हल्ल्यामुळे पर्यटनव्यवसायाला लागलेली खीळ आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांना बसलेला आर्थिक भुर्दंड यावर सुद्धा कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने असा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकते. यामुळे काश्मीर मध्ये सुरक्षा यंत्रणांना अतिरिक्त अधिकार कायम रहातील आणि अतिरेकी कारवाया कायमच्या संपुष्टात आणता येतील.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बिहार मधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग विरुद्ध इंडिया आघाडीचे पक्ष यांच्यातील संघर्ष चरम सीमेला पोचला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालू यादव यांचे सुपुत्र यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या नावाने असणारे एक मतदान ओळखपत्र दाखवले आणि माझे हे ओळखपत्र मला न सांगता रद्द केले आहे आणि अश्याच पद्धतीने अनेक नागरिकांची ओळखपत्रे रद्द केली असा दावा केला. यावर निवडणूक आयोगाने त्यांना उत्तर देताना सांगितले की आपल्या नावाने दुसरे मतदाता कार्ड आहे आणि त्यावरूनच आपण मतदान केले आहे. आपण जे ओळखपत्र दाखवत आहात त्या क्रमांकाचे ओळखपत्रच अस्तीत्वात नाही त्यामुळे आपल्याकडे असणारे ओरिजिनल ओळखपत्र तुम्ही आम्हाला द्या ते बनावट आहे का खरे हे आम्ही घोषित करू. आता प्रकरण न्यायालयात गेले आहे आणि हे सगळे उघड झाले तर बनावट ओळखपत्र बनवले म्हणून तेजस्वी यादव यांना तुरुंगात जावे लागू शकते. निवडणूक लढवण्यावर सुद्धा बंदी येऊ शकते. थोडक्यात बनावट मतदारांना वाचवण्याच्या नादात त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जगदीश धनकड हे न्यायव्यवस्थेवर अत्यंत कठोर शब्दात टीका करत होते त्यामुळे न्यायालय आणि सरकार यांच्यात विसंवाद आहे का अशी चर्चा रंगली होती. भ्रष्ट न्यायमुर्तींवर महाभियोग आणण्याला न्यायालयची संमती होती आणि त्याच वेळी मर्यादाबाह्य वक्तव्य करणार्या जज्जला सर्वोच्च न्यायालय कानपिचक्या देणार हे पण ठरले होते. धनकड यांनी विरोधी पक्षांचे बाहुले होत दोघांवर महाभियोग आणायचा प्रयास केला आणि त्यांची गच्छंती झाली. सरकारच्या कृतीने सर्वोच्च न्यायालय प्रसन्न झाले आणि चीनने 2000 किलोमीटर जमीन बळकावली या राहुल गांधी यांच्या आरोपावरील खटल्यात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगल्याच कानपिचक्या दिल्या,” तुम्ही जे बोलत आहात याचा तुमच्याकडे काहीही पुरावा नाही. तो सादर करण्याची तुमची तयारी आणि इच्छा सुद्धा नाही. तुम्ही भारतीय नागरिक आहात का ? कोणताही भारतीय नागरिक असे वक्तव्य करणार नाही.” या शब्दात राहुल गांधी यांना न्यायालयाने खडसावले आहे. नैतिकतेचा विचार केला तर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यायला हवा. परंतु नैतिकता आणि कोंग्रेस हे परस्पर विरोधी शब्द असल्याने ते शक्य नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सध्या महाराष्ट्रात माणसांच्या पेक्षा प्राण्यांचीच लोकांना जास्त काळजी पडली आहे. नांदणी इथल्या जैन मठातील हत्तीण त्यांना पोसणे जड झाली होती. म्हणून तिला मोहरमच्या साठी 4 लाख रुपये भाड्याने दिले जात होते. तिची काळजी घेणे शक्य होत नव्हते. तिने दोन माणसांचा जीव घेतला होता त्यात एक मठाधिपती सुद्धा होते. तिची काळजी घेतली जावी म्हणून पेटा सर्वोच्च न्यायालयात गेली आणि न्यायालयाने तिला वनतारा अधिवासात पाठवून तिची काळजी घ्या आदेश दिला. तोपर्यंत तिची काळजी न करणारे कोल्हापूरकर जागे झाले रस्त्यावर आले आणि तिला नांदणी मठातच आणा म्हणून भांडू लागले. कबुतरांमुळे हायपरसेंसीटीव्ह नीमोनीयाटीस होऊ शकतो म्हणून सरकारने मुंबईतील 51 कबुतरखाने बंद करण्याचा आदेश काढला त्या विरुद्ध सुद्धा पक्षीप्रेमी रस्त्यावर आले आहेत. कबुतरांचा त्यांना कळवळा आला आहे. कबुतराच्या विष्ठेने आणि पिसांमुळे हा आजार होतो असे डॉक्टर्स वारंवार सांगतात. परंतु त्याचे क्लिनिकल अनॅलिसिस नाही म्हणून हे पक्षीप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. थोडक्यात काय माणसाच्या जिवाची किंमत नाही आणि प्राण्यांसाठी प्राण कासावीस होतो.
🔽












Comments