top of page

उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः किती...

  • dhadakkamgarunion0
  • Mar 26
  • 2 min read

 अभिजीत राणे लिहितात

उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः किती अकार्यक्षम मुख्यमंत्री होते याची कबुली दिली आहे. विधानपरिषदेतील शेवटच्या दिवशी भाषण करताना त्यांनी माझ्या मुख्यमंत्रीपदाची खरी सुरुवात लॉकडाऊनच्या दिवशी झाली असे विधान केले. मात्र त्यांच्या शपथविधीनंतरचे 118 दिवस त्यांनी दुर्लक्षित केले. कोविड काळात महाराष्ट्रात दीड लाखांहून अधिक मृत्यू झाले, तर बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर यामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सरकारला घेरले. सुरू असलेले प्रकल्प स्थगित झाले, फेसबुक लाईव्हवरून लोकांना आश्वासनं दिली गेली पण प्रत्यक्षात कारवाई कमी झाली. वसुली रॅकेट, पोलीस व मंत्र्यांचे गुंडगिरीचे आरोप, अंबानी घराखाली बॉम्ब प्रकरण, तसेच आमदार-खासदारांशी संवाद न ठेवणे यामुळे जनतेत नाराजी वाढली. ठाकरे मातोश्रीत सुरक्षित राहिले, पण राज्यात गोंधळ आणि अव्यवस्था वाढली. एकंदर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे सर्वात अपयशी मुख्यमंत्री म्हणूनच इतिहासात स्थान मिळवणार यात संशय नाही.

 अभिजीत राणे लिहितात

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अशोक खरातने आपले साम्राज्य उभारले. सुशिक्षित भाग असूनही त्याच्या मठात महिलांचे शोषण, गर्भसंस्काराचे काळेधंदे सर्रास चालायचे. शेतकऱ्यांच्या वाटा बंद करून, लाखो लिटर पाणी त्याच्या बागेला देण्यात आले. सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यामुळे कारवाई टळली. खरात म्हातारा होऊन मेला असता तर त्याला भक्तांनी ईश्वरी अवतार घोषित केले असते. महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. सरकारने प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा महिला, बालके आणि गरीब लोक अशा खरातसारख्या ढोंगींचे बळी पडत राहतील.

 अभिजीत राणे लिहितात

केंद्र सरकारने मध्यपूर्वेतील युद्धस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वदलीय बैठक बोलावली. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने सर्व पक्षप्रमुखांना सहभागी होणे सहज शक्य होते. मात्र राहुल गांधी केरळमधील आधीच ठरलेल्या कार्यक्रमासाठी जाणार असल्याने या महत्त्वाच्या बैठकीत गैरहजर राहणार आहेत. विपक्ष नेत्याच्या भूमिकेतून देशावर गंभीर परिणाम करणाऱ्या विषयावर विचार मांडणे अपेक्षित असताना त्यांनी ही संधी नाकारली आहे. काँग्रेसला पूर्ण संधी असूनही राहुल गांधी उपस्थित राहणार नाहीत, यावर टीका होत आहे. काहींचे मत आहे की त्यांच्याकडे मांडण्यासारखा ठोस मुद्दा नाही, म्हणूनच ते केरळमधील कार्यक्रमाची सबब पुढे करत आहेत. अशा कृतींमुळे जनतेत त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

 अभिजीत राणे लिहितात

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी $२ मिलियन शुल्काबाबत टीका करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की जगभरातील अनेक देश महत्त्वाच्या सागरी मार्गांवरून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. उदाहरणार्थ, सुएझ कालव्यातून प्रवासासाठी $२,००,००० ते $७,००,००० पर्यंत शुल्क घेतले जाते, तर पनामा कालव्यात नेओपॅनामॅक्स जहाजांसाठी $५,००,००० पर्यंत शुल्क आकारले जाते. तुर्की, कॅनडा आणि अमेरिका देखील त्यांच्या मार्गांवर शुल्क घेतात. मात्र, इराणने दशकानुदशके हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही, जरी त्यांना प्रतिबंध आणि एकाकीपणाला सामोरे जावे लागले. शेवटी त्यांनी प्रश्न केला: “हे सगळं असूनही, खलनायक इराणच आहे असे तुम्ही जगाला पटवून देऊ इच्छिता?”

 अभिजीत राणे लिहितात

राज्याच्या मंत्र्यांचा तृतीयपंथी सोबतचा व्हिडिओ समोर येताच सरकारची अब्रू धुळीस मिळाली आहे. लोकशाही वृत्तवाहिनीवर दाखवलेला हा प्रसंग केवळ वैयक्तिक वर्तनाचा प्रश्न नाही, तर शासकीय प्रतिष्ठेचा अपमान आहे. संबंधित खात्यातील खरात प्रकरण आधीच उघडकीस आलेले असताना, FDA विभागाने इतक्या मोठ्या प्रमाणात वायग्रा व इतर औषधांचा पुरवठा कसा होऊ दिला, हा गंभीर प्रश्न आहे. पुरवठादारांवर गुन्हे दाखल न होणे ही प्रशासनाची उघडीपणे झालेली चूक आहे. राजकारणातील अशा कांडांमुळे जनतेचा विश्वास ढासळतो. ठरवून व्हिडिओ लीक करण्यात आला असावा, अशी चर्चा आहे. पण खरी जबाबदारी ही पारदर्शकतेची आहे. मंत्री असो वा अधिकारी, लोकशाहीत जबाबदारी टाळता येत नाही.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page