मराठी मुलांवर अविवाहित रहाण्याचे संकट !!!
- dhadakkamgarunion0
- 2 days ago
- 3 min read
संपादकीय
अभिजीत राणे
मराठी मुलांवर अविवाहित रहाण्याचे संकट !!!
आजच्या महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर एक अस्वस्थ करणारा प्रश्न डोकं वर काढत आहे – तो म्हणजे मराठी मुलांचे न जमणारे विवाह. एकेकाळी 'मुलगा घरंदाज आणि सुशिक्षित आहे' एवढी ओळख लग्नासाठी पुरेशी ठरायची. पण आज चित्र पालटलं आहे. अनेक सुशिक्षित, चांगल्या पगाराच्या नोकरीत असणाऱ्या मराठी मुलांचे विवाह जमणे दुरापास्त झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आज अनेक मराठी मुली आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून अमराठी तरुणांची निवड करताना दिसत आहेत. यामागे केवळ 'योगायोग' नसून काही महत्त्वाची सामाजिक आणि मानसिक कारणं आहेत, ज्याकडे मराठी मुलांनी गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
आजची मराठी मुलगी स्वावलंबी आहे, शिकलेली आहे आणि जागतिक स्तरावर काय चाललंय याची तिला पूर्ण जाण आहे. साहजिकच, तिच्या अपेक्षांचा स्तरही उंचावला आहे. मुलींना केवळ 'मुलगा कमावता आहे' एवढंच आता पुरेसं वाटत नाही. त्यांना हवा असतो असा जोडीदार, जो देखणा असेल, ज्याचं व्यक्तिमत्व रुबाबदार असेल आणि ज्याच्याकडे प्रभावी संभाषण कौशल्य (Communication Skills) असेल.
अमराठी तरुणांच्या बाबतीत पाहिलं, तर विशेषतः उत्तर भारतीय किंवा दाक्षिणात्य शहरी तरुणांमध्ये स्वतःला 'प्रेझेंट' करण्याची एक वेगळी शैली असते. आधुनिक पेहराव, आत्मविश्वासाने बोलणं आणि आधुनिक जीवनशैलीशी पटकन जुळवून घेणं या गोष्टींकडे त्यांचा कल असतो. याउलट, मराठी मुलांमध्ये अनेकदा 'साधेपणा' हाच दागिना असल्याचा एक समज असतो. पण आजच्या 'ग्लोबल' जगात केवळ साधेपणा चालत नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
मराठी मुलांच्या विवाह कोंडीचं एक मुख्य कारण म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे होणारं दुर्लक्ष. 'मी कसा दिसतो यापेक्षा माझं काम कसं आहे' हा विचार कामाच्या ठिकाणी ठीक असला, तरी वैयक्तिक आयुष्यात आणि विशेषतः लग्नाच्या बाजारात तो घातक ठरत आहे. अनेक मराठी तरुण नोकरी किंवा व्यवसायात इतके मग्न होतात की, व्यायामाकडे त्यांचं पूर्णतः दुर्लक्ष होतं. वाढलेलं पोट, विस्कळीत राहणीमान यामुळे पहिल्याच भेटीत (First Impression) ते मुलींच्या पसंतीस उतरत नाहीत. याउलट, आजच्या मुली स्वतःच्या फिटनेसबाबत जागरूक आहेत आणि त्यांना जोडीदारही तसाच हवा असतो.मराठी मुलांकडे ज्ञान असतं, पण ते प्रभावीपणे मांडण्यात ते कमी पडतात. विशेषतः इंग्रजी किंवा हिंदीत संवाद साधताना येणारा संकोच किंवा संवादातील कोरडेपणा अडथळा ठरतो. मुलींना असा जोडीदार हवा असतो जो समाजात वावरताना चारचौघात आत्मविश्वासाने बोलू शकेल. आजच्या जगाला 'जे दिसतं ते विकतं' हा नियम लागू आहे. याला 'दिखाऊपणा' म्हणून हिणवण्यापेक्षा 'सादर करण्याची कला' (Presentation) म्हणून पाहणं गरजेचं आहे. आधुनिक कपडे, नीटनेटके केस आणि एकूणच प्रसन्न व्यक्तिमत्त्व यांकडे मराठी मुले दुर्लक्ष करतात, जे अमराठी मुले अत्यंत कौशल्याने हाताळतात.
ही सामाजिक समस्या केवळ चिंता व्यक्त करून सुटणार नाही, तर त्यासाठी मराठी तरुणांना स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील.
'साधा आणि सुटसुटीत' राहण्यापेक्षा 'फिट आणि रुबाबदार' राहण्याला प्राधान्य द्या. नियमित व्यायाम, योगासने किंवा किमान ३० मिनिटे चालणे यामुळे शरीरात आत्मविश्वास येतो, जो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. केवळ मराठीतच नाही, तर हिंदी आणि इंग्रजी भाषेतही संवाद साधण्याचा सराव करा. वाचन वाढवा, जेणेकरून कोणत्याही विषयावर तुम्ही तासाभवर गप्पा मारू शकाल. तुमच्या बोलण्यातील 'आर्गांत'पणा किंवा 'लाजाळूपणा' काढून टाका. लग्नासाठी किंवा मुलीला भेटायला जाताना आधुनिक फॅशनचा विचार करा. तुमच्या अंगावर कोणते रंग शोभतात, कोणती हेअरस्टाईल तुम्हाला सूट होते, याकडे लक्ष द्या. चांगला सुवास (Perfume) आणि नीटनेटके बूट या छोट्या गोष्टी मोठ्या परिणामासाठी महत्त्वाच्या असतात. मुलींना केवळ परंपरा पाळणारा मुलगा नको असतो, तर बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला बदलणारा जोडीदार हवा असतो. स्त्री-पुरुष समानता, घरातील कामात मदत करण्याची तयारी आणि मोकळा दृष्टिकोन ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. मराठी असल्याचा अभिमान असणे चांगली गोष्ट आहे, पण तो अभिमान अहंकारात बदलू देऊ नका. जगाशी स्पर्धा करायची असेल, तर जगाच्या भाषेत आणि ढंगात वागायला शिका.
विवाह ही केवळ दोन जीवांची भेट नसून ती दोन व्यक्तिमत्त्वांची निवड असते. मराठी मुली जर अमराठी जोडीदारांकडे आकर्षित होत असतील, तर त्यामागे केवळ 'बाहेरचा चमकधमक' नसून तो 'आत्मविश्वास' आणि 'सादरीकरण' आहे. मराठी मुलांनी जर वेळीच सावध होऊन स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर काम केलं, आपल्या गुणांची योग्य मांडणी केली, तर ही 'विवाह कोंडी' नक्कीच सुटू शकते.
साधेपणा हा गुण आहेच, पण तो जेव्हा आधुनिकतेच्या जोडणीने सजतो, तेव्हाच तो अधिक प्रभावी ठरतो. मराठी तरुणांनी आता 'स्व'चा शोध घेत स्वतःला अधिक प्रगल्भ, देखणं आणि बोलकं करण्याची गरज आहे.








Comments