🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- May 5
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठाच्या वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स इथे एका चर्चेदरम्यान भगवान रामांना "पौराणिक पात्र" असे संबोधले . त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपने ‘हिंदूविरोधी मानसिकता’ असल्याचा आरोप केला आणि राहुल गांधींना ‘रामविरोधी’ असे संबोधले आहे. रामाचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले,” आपले सर्व पौराणिक पात्र प्रभू रामसुद्धा क्षमाशील, करुणामय होते. माझ्या दृष्टीने खरा हिंदू विचार हा अधिक बहुविधतेने भरलेला, अधिक समावेशक, अधिक प्रेमळ, सहिष्णू आणि खुला आहे. माझ्या मते, दुसऱ्यांबद्दलचा राग आणि द्वेष हा भीतीतून निर्माण होतो. जर तुम्हाला भीतीच नसेल, तर तुम्ही कुणाचा द्वेष करत नाही," त्यांचे हे वक्तव्य हिंदू संस्कृतीबद्दलचे योग्य भाष्य असले तरी रामाला दंतकथा संबोधणे कोणत्याही भारतीयाला आवडणार नाही. परंतु हिंदू मतदार फुकटच्या आश्वासनांवर मतदान करत असल्याने राहुल गांधी यांनी हिंदू धर्मावर कितीही दुगाण्या झाडल्या तरी बेशरम हिंदू त्याला परत निवडून देतीलच यात संशय नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
विदर्भाला मागे टाकत पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. काल राज्यातील सर्वाधिक तापमान पुणे शहरात होतं. शहरातल्या लोहगावात ४२.८ अंश तापमान नोदवलंय. तर पुण्याच्या आसपास ४०.६ वर पारा होता. तिकडे विदर्भ,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम होता. अकोला, वाशिममध्ये काल पारा ४२.४ अंशावर तर परभणीत ४२.४ आणि बीडमध्ये ४१.९अंशावर तापमान होतं. सगळे रस्ते काँक्रिटचे, फुटपाथ पण काँक्रिटचे , झाडांचा अक्षरशः पत्ताच नाही, या सगळ्या विचित्र चकचकीत आधुनिकीकरणाचा हव्यास पुण्याला महागात पडतो आहे. दुसरे कारण रस्त्याच्या दोन्हीही बाजूला असलेल्या हॉटेल्स आणि आयटी कंपनीच्या बहुमजली इमारती. ज्याना बाहेरच्या बाजूला उष्णता परावर्तीत करणारी पॅनेल्स बसवली आहेत. या तसेच इतर इमारतीमधील अजस्त्र आणि उष्णता बाहेर फेकणारे वातानुकूलन यंत्र. सगळ्यात महत्वाचा मुद्दा संपूर्ण शहरात पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याची काहीही यंत्रणाच नाही. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. भूगर्भजल स्तर वेगाने खाली जातो आणि परिणाम असह्य उन्हाळा. या उष्णता वाढीचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे. वेळेत कमी न झाल्यास सर्वत्र वाळवंटात असल्यासारखे वाटू लागेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सुरक्षा यंत्रणांनी पहलगाम हल्ला झाल्यानंतर एकाच दिवसात तब्बल 1500 लोक उचलले होते आणि त्यांच्याकडून हाती मिळालेली माहिती भयावह आहे. पहलगाम मधील आजवर कधीही वापरात नसलेला हा टुरिस्ट स्पॉट दोन महिन्यांच्या आधी स्थानिक प्रशासनाने सूरु केला. हे करताना राज्य सरकार, पोलिस खाते आणि सैन्य कुणालाही कल्पना दिली गेली नाही. या स्पॉटच्या जवळपास असणार्या घरांमध्ये गेला एक महिना तब्बल 35 अतिरेकी रहात होते. स्थानिक चहा वाला , भेल वाला , घोडे वाला , टॅक्सी वाला या सगळ्यांना या सर्व गोष्टींची माहिती होती. घटनेच्या आदल्या दिवशी ड्रोनचा वापर करून 35 अतिरेक्यांसाठी शस्त्रे आली. ती घेऊन येणारी गाडी खराब झाली आणि नंतर या बंदुकांना घोड्यावरून आणि बाइक वरुन आणायला उशीर झाला त्यामुळे हाती असलेल्या मोजक्या बंदुका घेऊन चार जणांनी हल्ला चढवला अन्यथा नियोजन असे होते की 5000 पर्यटक हिल टॉप वर असतील आजूबाजूच्या घरांमधून आणि सगळ्याच बाजूने 35 दहशतवादी बेछूट गोळीबार करून सर्व उपस्थित पर्यटकांना मारून टाकतील. पहलगाम हल्ला या विषयावर व्यक्त होण्यापूर्वी दुसरे जालियनवाला हत्याकांड झाले नाही यासाठी देवाचे आभार माना.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पुणे जिल्ह्यातील विमानतळाला काही केल्या मुहूर्त लागत नाही आहे. पुरंदरला विमानतळ करण्यासाठी अनेक वर्षांपासून अजित दादा आग्रही आहेत परंतु ज्या सात गावातील भूमीचे अधिग्रहण करून विमानतळ बनवण्याची योजना आहे त्या सातही गावांचा याला कडाडून विरोध आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे आजवर तिथला सर्व्हे होऊ शकलेला नाही. महसूल खात्याचे कर्मचारी पोलिस बंदोबस्तात जाऊनही ग्रामस्थांच्या विरोधामुळे त्यांना परत फिरावे लागले आणि नंतर त्यांनी ड्रोनचा वापर करून सर्व्हे करण्याचा प्रयास केला आणि वातावरण चिघळले. "गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात अनेक पोलीस जखमी झाले आणि पोलिसांच्या वाहनांचंही नुकसान झालं," असं पोलिसांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, गावकऱ्यांनी आधी पोलिसांनी लाठीचार्ज करत मारहाण केल्याचा आरोप केला. संपूर्ण देशात सरकारी प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेतली जाते आणि वर्षानुवर्षे पुनर्वसन होत नाही त्यामुळे लोक आता जमिनी देण्यास कठोर विरोध करू लागले आहेत. कोयना धरणात विस्थापित झालेल्या गावांचे अजूनही पुनर्वसन झाले नाही यावरून सरकारची काम करण्याची शैली दिसून येते. त्यामुळे ग्रामस्थांचा रोष चुकीचा नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महायुती सरकार आकाराला येताना मुख्यमंत्रीपद रोटेशन पद्धतीने ठरवले गेले आहे का ? असा प्रश्न आता निर्माण होतो आहे. पहिल्यांदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. मग भाजपाला दणदणीत यश मिळाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडू लागले आहे. आता या स्वप्नाची पूर्तता करायची असेल तर अजित पवारांना किंवा शिंद्यांना आपला पक्ष भाजपात विलीन करावा लागेल अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली असली तरी जर देवेंद्र फडणवीस केंद्रात मोठ्या पदावर गेले तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आलटून पालटून संधी मिळू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अर्थात कुणाला पहिली संधी मिळणार हे ठरवण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्या कडे असल्याने दोघेही देवेन्द्रजींच्या प्रत्येक शब्दाला झेलून काम करताना दिसतात आणि तीन पक्षांचे सरकार असले तरी सामान्यतः जो सत्ता संघर्ष दिसतो इथे त्याचा पूर्ण अभाव आहे.
🔽





Comentários