🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 23
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याने लोक संतप्त झाले आहेत. परंतु हा हल्ला आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्लाच आहे. पाकिस्तान पाच फेब्रुवारी हा अखंड कश्मीर दिवस म्हणून साजरा करतो. यावर्षीच्या पाकव्याप्त काश्मीर मधील या कार्यक्रमाला हमास चा इराण मधील प्रतिनिधी खालीद अल कदाऊमी हा उपस्थित होता. पाकव्याप्त काश्मीर मध्ये झालेल्या या सोहळ्याला पाकिस्तानातील सर्वात मोठी मूलतत्ववादी मुस्लिम संघटना जमात ए इस्लामी चे प्रमुख फजल उर रेहमान पण आले होते. या शिवाय आय एस आय चे वरिष्ठ , लश्कर ए तयब्बा संघटन प्रमुख अशी सगळी नामचीन मंडळी आली होती. हमास ने पाकिस्तानी सैन्याला आणि अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले असण्याची शक्यता आहे कारण या हल्ल्यात आणि इस्त्रायल मधील 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यात प्रचंड साम्य आहे. त्यामुळे या अंगाने सुद्धा तपास आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्रातील मिडिया उघड उघड खोट्या बातम्या देतो आहे. आता त्यांच्यावर कारवाई केली नाही तर सरकार नेभळट आहे असा संदेश जाईल. अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १५० कोटी रुपयाचे टेंडर काढले आहे.अशी बातमी दैनिक लोकमत ने टेंडर ची बातमी छापताना छापून टाकले. सदर टेंडर लोकमत आणि पुढारी या दोन दैनिकांना छापण्यासाठी दिले होते . पुढारी. १५००००००.०० रुपये असे मूल्य छापतो आणि लोकमत १५०००००००० असे मूल्य छापतो. लोकमतने नीचपणा करून दशांश चिन्ह हटवले आणि १.५० कोटीचे १५० कोटी करून टाकले. हा खोटारडेपणा कसा उघड झाला. तर शासकीय कंत्राट देताना 1 % रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाते. मग दीड कोटीची सुरक्षा ठेव दीड लाख होणार आणि दीडशे कोटीची सुरक्षा ठेव दीड कोटी होणार. सुरक्षा ठेव मूल्य दीड लाखच ठेवले आणि लोकमतचा हा हलकटपणा उघड झाला. सरकारने भविष्यात लोकमत या वृत्तपत्राला काळ्या यादीत टाकून त्यांना जाहिराती देणे बंद करावे आणि या जाहिरातीबद्दल माफी न मागितल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता हे आपण फार वेळा ऐकले आहे. परंतु युवराज राहुल गांधी सुद्धा भारतात काही दुर्दैवी घटनाक्रम घडत असेल तर त्यावेळी मजा मारतानाच दिसतात. 26/11 चा हल्ला झाला त्यावेळी राहुल गांधी पार्टी करत होते. आता सुद्धा भारतात इतकी दुर्दैवी घटना घडली आहे परंतु मुख्य विरोधीपक्ष नेता देशात नाही आणि त्याला परतण्याची काहीही इच्छा सुद्धा नाही ते आपला पूर्वनियोजित कार्यक्रम उरकूनच अवतरतील आणि आल्यावर मोदींना प्रश्न विचारतील. या उलट भारताबाहेर असणार्या प्रत्येक केंद्रीय मंत्र्याने आपला दौरा अर्धवट सोडला असून सगळे भारतात परत आले आहेत. जबाबदारी आणि युवराज या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आणखी एकदा या निमित्ताने सिद्ध झाले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
हिंदूंमधील प्रतिकार क्षमता , आत्मसंरक्षण करण्याची वृत्ती आणि क्षात्रभाव हा पूर्ण लोपला आहे. संविधानाने आम्ही तुमचे रक्षण करू हे अभिवचन दिल्याने हिंदूंनी शस्त्रत्याग केला आणि संविधान रक्षण करत असेल तर मला संघर्ष करण्याची , आत्मसंरक्षण करण्यासाठी लढण्याची , बलिष्ठ शरीर असण्याची वृत्ती विकसितच करायची गरज नाही अशी एक घातक विचारसरणी पालक आणि मुले दोघांमध्येही विकसित झाली आहे आणि ही गोष्ट खूप खूप घातक आहे. पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात गोळ्या घातलेल्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांच्या बरोबर होते, कुणाची पत्नी होती , कुणाची पत्नी आणि मुलगा सोबत होता परंतु कर्त्या पुरुषाला मारल्यावर महिला अतिरेक्यांकडे आम्हाला पण मारून टाका अशी याचना करत होत्या. मुले आम्हाला पण मारून टाका ही याचना करत होते. पण कोणीही त्या अतिरेक्यांशी आपण लढू शकतो , त्यांना प्रतिकार करू शकतो , अगदी एखादी झापड, एखादी बुक्की मारू शकतो असा सुद्धा विचार केला नाही. कारण शारीरिक संघर्ष करण्याची मानसिकताच आपण घालवून बसलो आहोत आणि हे अधिक धक्कादायक आणि भयावह सत्य आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
राज्य सरकारने इयत्ता पहिली पासून हिंदी विषय अनिवार्य हे धोरण बदलून हिंदी विषय ऐच्छिक करण्याचा निर्णय घोषित केला आहे . खाजगी वाहिन्यांनी त्रिभाषा सूत्राला विरोध सुरू केला आहे . इयत्ता पहिली पासून ३ भाषा शिकण्याची काय आवश्यकता आहे ? या प्रश्नावर चर्चा सुरू केली आहे. मनसे सारखा प्रादेशिक राजकीय पक्ष ज्यांना २% जनतेचाही पाठिंबा नाही . पण येथे मराठी भाषा संरक्षणाची हाक देऊन अन्य भारतीय भाषा विरोधात जनतेत द्वेष निर्माण करून महाराष्ट्रात एक अराजक परिस्थिती निर्माण करत आहेत . महाराष्ट्रात भाषिक वाद निर्माण करून सामाजिक विद्वेष निर्माण करणाऱ्या राजकीय पक्षानं विरोधात कोणताही राजकीय पक्ष विरोधी भूमिका घेणार नाही . महाराष्ट्रात मराठी भाषा शिकण्याची सक्ती सर्व शाळात आहे . पण येथे पहिली पासून इंग्रजी विषय शिकवण्यास या तथाकथित मराठी प्रेमी राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे ? या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष मौन बाळगून आहेत . मराठी भाषा प्रश्नावर अराजक निर्माण करणाऱ्या राजकीय पक्षानं विरोधात जनहित याचिका दाखल केली पाहिजे . या याचिकेत सदर अराजकवादी पक्षांचे राजकीय पक्ष म्हणून मान्यता काढून घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली पाहिजे . परंतु यापैकी काहीही होणार नाही प्रत्येक जण द्वेषाची चूल पेटवून आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्यात मग्न आहे.
🔽





Comments