🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 4
- 4 min read





🖋️ अभिजीत राणे लिहितात
संगणकाच्या जगात सगळ्यात जास्त महत्व डेटा या गोष्टीला असते आणि सामान्य लोकांना यामागील अर्थशास्त्र कधीच समजत नाही. जोमाटो किंवा स्वीगी सारखे अप्प वापरणारे काही रोज त्यांच्याकडून अन्न मागवत नाहीत. परंतु तुम्ही एकदा अप्प डाउनलोड केले की ते अप्प तुमच्याही नकळत तुमची सर्व माहिती जमा करून विकत असते. यात तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन वर काय काय ब्राऊज करता , तुमच्या आवडीनिवडी हे सगळे ते विकते आणि तुमच्याही नकळत तुम्हाला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर तुमच्या आवडीनिवडी नुरूप जाहिराती दिसू लागतात. मध्यंतरी 10 वर्ष जुना फोटो टाकायचा ट्रेंड आला होता, आता घिबली ट्रेंड आला आहे. यातून तुम्ही जे फोटो टाकता त्यातून शरीरशास्त्राचा अभ्यास करणार्या लोकांना , चेहरा आणि भौगोलिक स्थान या दृष्टीने अभ्यास करणार्या लोकांना , कॉस्मेटिक उत्पादने बनवणार्या लोकांना लागणारा डेटा तुमच्या फोटोच्या माध्यमातून फुकटात लोड होतो आणि हाच डेटा विकून इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रचंड पैसे कमवतात. अश्या पद्धतीने तुमच्याही नकळत तुमचं डेटा वापरला जाणे हे तुमच्या वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे पण लोक याचा विचारच करत नाहीत. गतानुगतिको लोका या न्यायाने एक जण ट्रेंड सुरू करतो आणि आंधळेपणाने त्याला कोट्यवधि लोक बळी पडतो. ते लोक पैसे कामावतात आणि आपण गिनीपिग म्हणून वापरले जातो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या संदर्भात ज्या कोलांट्या उड्या मारल्या आहेत त्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या जातील. मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारा आणि नैसर्गिक न्याय तत्वाला काळिमा फासणारा कायदा म्हणजे वक्फ कायदा होता. त्यात बदल करणे अनिवार्य होते अन्यथा अजून पाच वर्षात वक्फने देशभरातली सगळ्याच जमिनी गिळंकृत केल्या असत्य. हा कायदा कोंग्रेसने जाणीवपूर्वक आणला होता आणि त्याचा गैरवापर करून वक्फ हाच सगळ्यात मोठा लँड माफिया होऊन बसला होता. या कायद्याने वक्फ बोर्डाला चाप बसणार आहे. यात वक्फ बोर्डाला मनमानी पद्धतीने जमिनी गिळंकृत करता येणार नाहीत. यात कुठेही सामान्य मुस्लिम नागरिकांच्या हक्कांवर गदा येणार नाही. ना कोणत्या मालमत्ता व्यापार्यांच्या घशात जाणार आहेत. तरीही उबाठा गटाने अपप्रचार करत. अदानी आणि अंबानी यांचा यात काहीही संबंध नाही तरी उबाठा गटाने त्यांना ओढून टीका करणारी भाषणे ठोकून आपला पक्ष कोंग्रेसचा गुलाम झाल्याचे सिद्ध केले. आता हिंदुत्ववादी मंडळी पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची खबर आल्याने मालक आणि त्याचा श्वान हवालदिल झाले आहेत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुंडगिरीला पोलिस आळा घालणार आहेत का या गुंडांना मोकाट सोडणार आहेत ? गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसैनिकांना नद्यांची साफसफाई , मराठी भाषेत बँकेतील व्यवहार होत आहेत का ? या दोन गोष्टींची तपासणी करण्याचे टार्गेट दिले होते. एकही मनसैनिक नद्यांची दुरावस्था बघायला गेला नाही. परंतु सगळे जण स्मार्ट फोन घेऊन घोळक्याने मुंबईतील बँकामध्ये जाऊन गुंडगिरी करत आहेत. हे इथेच थांबत नसून दहशत पसरवण्यासाठी त्यांनी स्वतःच हे व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली आहे. मुळातून राष्ट्रीयकृत बँक असेल तर तिथला स्टाफ देशभरातून कोठूनही आलेला असू शकतो. त्याने आल्या आल्या मराठीत बोलावे हा हट्टच चुकीचा आहे. समजा मॅनेजर मराठी बोलू शकत नसेल तर इतर कर्मचारी असतात की मराठीत बोलणारे त्यामुळे अडचण येत नाही. केंद्र सरकारचे त्रिभाषा धोरण आहे फक्त मराठी धोरण नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा. राज ठाकरे यांच्यासह किती नेत्यांची मुले मराठी शाळेत जातात ? अगदी या गुंडगिरी करणार्या कार्यकर्त्यांपैकी किती जणांची मुले मराठी शाळेत जातात ? गृहखात्याने या सगळ्या घटनाक्रमाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. या गुंडगिरीला आळा घालणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
एखादी व्यक्ती आपल्या कर्तव्याप्रती किती प्रेरित असू शकते याचे उदाहरण म्हणजे अमित शहा आहेत. त्यांना उगीचच आधुनिक चाणक्य संबोधले जात नाही. वक्फ सुधारणा विधेयकवर दिवसभर घणाघाती चर्चा झाली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मध्यरात्री हे विधेयक मतदानाला आले आणि पारित झाले. त्यानंतर सगळेच विरोधी पक्षाचे नेते थकून गेले होते, अश्यावेळी अमित शहा यांनी मणीपुरमध्ये राष्ट्रपती राजवट लावली आहे त्याला संसदेने मंजूरी द्यावी असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर चर्चा झाली. विरोधी पक्षांनी आपले मुद्दे मांडले परंतु त्यात जोर नव्हता. दिवसभरातील थकवणार्या चर्चेने आणि अंतिमतः झालेल्या पराभवाने विरोधक मानसिक दृष्ट्या खच्ची झाले होते त्यामुळे मणीपुर राष्ट्रपती राजवट या विषयावर फारसा वादंग न होता या मुद्द्याला संसदेची मंजूरी मिळून गेली. ज्या मुद्द्यावर लोकसभेत एखादा दिवस तरी रणकंदन झाले असते तो मुद्दा तासाभरात आटोपला. अमित शहा यांचे यात विशेष कौतुक यासाठी आहे की वक्फ कायद्याच्या चर्चेवेळी ते संपूर्ण कालावधी सभागृहात उपस्थित होते आणि तरीही मध्यरात्री मणीपुरचा विषय मार्गी लावण्यासाठी त्यांनी अजून तासभर खर्च करून हवे ते पदरात पाडून घेतलेच.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नितिन भाऊंना झाले तरी काय ? असा प्रश्न सध्या हिंदुत्ववादी मंडळी विचारत आहेत. गेल्या काही महिन्यातील नितिन भाऊंच्या कृती आणि वक्तव्य हे संघ आणि भाजपाच्या मुशीतील हिंदुत्वाला छेद देणार्याच आहेत. या घटनाक्रमाची सुरुवात पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला जाण्याने झाली. पुरुषोत्तम खेडेकर हे पुरोगामी , कट्टर ब्राह्मणद्वेष्टे, संभाजी ब्रिगेडला वैचारिक बैठक प्रदान करणारे विचारवंत आणि शिवधर्म नावाच्या एका उचापतीत सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अश्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला गडकरी यांनी जाणे हेच भुवया उंचावणारे होते. या कार्यक्रमात गडकरी व्यासपीठावर आले त्यावेळी कोळसे पाटील हे निवृत्त न्यायमूर्ती भाषण करत होते त्यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख फेकू म्हणून केला आणि नितिन जी तुम्ही पंतप्रधान व्हा अशी इच्छा व्यक्त केली. याला नितिनजींनी हसून प्रतिसाद दिल्याने हिंदुत्ववादी मंडळी दुखावली होती. आता त्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर राज्यकर्ते होते आणि त्यांच्या सैन्यात मुस्लिम अधिकारी होते. हे धादांत खोटे वक्तव्य आहे आणि हे शेकडो वेळा नामचीन इतिहासकारांनी सिद्ध केले आहे तरीही ब्रिगेडी मंडळी रेटून खोटे बोलतात. त्यांचीच री नितिन भाऊंनी ओढल्यामुळे हिंदुत्ववादी प्रचंड संतापले आहेत. जिन्ना यांची स्तुती करणे अडवाणी यांना महागात पडले होते आणि त्यांना पंतप्रधान होता आले नाही. नितिन गडकरी यांनी यातून बोध घेऊन सावध होणे आवश्यक आहे.
🔽
コメント